मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) सूचनेनुसार मुंबई विद्यापीठाने अंतिम वर्ष व सत्र वगळता इतर वर्षांतील विद्यार्थ्यांना 50:50 सूत्रानुसार गुणदान करण्याचा निर्णय घेतला असून, परिपत्रक जारी केले आहे.
त्यानुसार दुसऱ्या, चौथ्या व सहाव्या सत्रांच्या अंतर्गत गुणांच्या राहिलेल्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने, लघुप्रबंध सादर करून, दूरध्वनीद्वारे मौखिक परीक्षा घेऊन किंवा सादरीकरण करण्यास सांगून, निरंतर मूल्यमापन इत्यादी सोईस्कर पद्धतीचा अवलंब करून पूर्ण कराव्यात अशी सूचना केली आहे.
शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील अंतिम वर्ष वगळून इतर वर्षांच्या सम सत्रांमधील विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता 50 टक्के अंतर्गत गुण व 50 टक्के त्याच वर्षातील मागील सत्राच्या (उदाहणार्थ एक, तीन, पाच, सात) गुणांच्या आधारावर निकाल लावण्याची कार्यप्रणाली विद्यापीठाने जाहीर केली आहे. मागील सत्रांचे सरासरी गुण काढण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्व विषयांचे गुण ग्राह्य धरावेत. अनुत्तीर्ण किंवा उत्तीर्ण सर्व विषयांच्या गुणांची बेरीज करून त्याचे 50 गुणांमध्ये रूपांतर करावे. यात विषम सत्रांच्या परीक्षांतील एखाद्या विषयातील पुनर्मूल्यांकनाच्या गुणांत बदल झाले असतील, तर ते गुण ग्राह्य धरावेत, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.
Social Plugin